दादासाहेब तोरणेंचे विस्मरण नको!
भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय चित्रपटसृष्टीच्या जन्मशताब्दी संवत्सराला येत्या ३ मेपासून सुरुवात होत आहे. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांनी बनवलेला "राजा हरिश्चंद्र" हा पहिलावहिला भारतीय मूकपट ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला हा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र मुंबईच्या ज्या 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ'मध्ये ३ मे रोजी दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' प्रथम दाखवला गेला. त्याच सिनेमागृहात जवळजवळ वर्षभर आधी, म्हणजे १८ मे १९१२ रोजी रामचंद्र गोपाळ उर्फ दादासाहेब तोरणे यांनी तयार केलेला 'श्री पुंडलिक' दाखवला गेला होता. या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या संदर्भातील सर्व माहिती कागदोपत्री उपलब्ध असून तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे “मालवणी मुलखा”तील एका कर्तबगार कलाकारावर अन्याय होत आहे. त्याला वाचा फुटावी हेच या लेखाचे प्रयोजन आहे. त्यात कोणत्याही वादाचे मूळ कोणी शोधू नये.
दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात १३ एप्रिल १८९० रोजी दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली. काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली.
'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. 'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली.
असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेषम्हणचे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. 'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी.
रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७मध्ये प्रसिध्द केले आहे.
'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले.
दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. त्यानंतर दादासाहेबांनी चित्रपटक्षेत्राला कायमचाच रामराम ठोकला. १९ जानेवारी १९६० रोजी या महान कलाकाराने आपली जीवनयात्रा संपविली.
राईटबंधूंच्या विमानाच्या शोधाची कथा जेव्हा सांगितली जाते, तेव्हा मुंबईच्या गिरगाव चौपटीवर तळपदेबंधूंनी विमानोड्डाणाच्या केलेल्या अल्पशा प्रयोगाचीसुध्दा दखल आपण भारतीय घेत असतो. अशा पार्श्वभूमीवर दादासाहेब तोरणे यांनी तर पहिला चित्रपट तयार करून तो प्रदर्शितही केला होता, मग त्याची दखल आपण का घेऊ नये? एवढेच म्हणावेसे वाटते.
या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेले विचार हे ब्लॉगरचे स्वतःचे विचार आहेत. जर आपल्याला या ब्लॉगविषयी आक्षेप असेल तर कृपया येथे क्लिक करा
या पोस्टवर एकूण (1) प्रतिक्रिया इतर वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा आणि तुमची प्रतिक्रिया लिहा
प्रतिक्रिया पाठवण्यात अडचण येत असल्यास आम्हाला या पत्त्यावर कळवा.-- mtonlineeditor@indiatimes.co.in
दर्जा (मत देण्यासाठी कर्सर स्टारवर घेऊन जा आणि क्लिक करा)
प्रतिक्रिया लिहिल्यानंतर डावीकडच्या चौकटीत तुमच्याविषयीची माहिती लिहा किंवा तुमच्या फेसबुक अकाउंटवरून साइन-इन करा. फेसबुक साइन-इनसाठी खाली क्लिक करा.
सिनेमा फॅशन आत ताजे पोस्ट
कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने मंडेलांची 'वन नेशन, वन टीम' मास्टरपीस! तो पागल, स्टुपिड अन् बावऱ्या मनाचा! शेण, चॉकलेट, केळं इ. इ. नानाच्या घरी आरसा नाही!कुमार कदम यांचे ताजे पोस्ट
खड्ड्यांत गेला मुंबई-गोवा हायवे गळ्यात गळा की गळेकापू? महामार्गावरील अपघात कसे टाळायचे? कोकणच्या पर्यावरणाबाबत सरकारचा मुखभंग कोकण रेल्वेविरुद्ध चिपळूणकरांचे आंदोलन कोकणचा आंबा स्वावलंबी होतोय! तारापूरच्या व्यथांना ‘येलो ऑस्कर’चे नामांकन कोकणच्या मारेक-यांना आणखी एक दणका! गोव्यातील प्रवेश कराचे दुखणे इन्सुलीचे इन्जेक्शन!कुमार कदम यांचे सर्वाधिक वाचलेले
मागील
« January 2014 | ||||||
Sun | Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | |||
5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 |
12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 |
19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 |
26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 | |
लेखकाविषयी
कुमार कदम हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असून कोकण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. कोकणनामातून ते कोकणातील विविध चालीरिती,समस्या तसेच सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेतील.
प्रतिक्रिया:
विभागणीनुसार सर्वात नवे | सर्वात जुने | सर्वाधिक चर्चिलेलेshrikrishna pendharkar
Many a real hero has died unsung and unrecognized. Of such anomalies is life of
homo sapiens made..Occasionally a kumar kadam raises his head and nudges us
into paying the dues to the hero who has left the stage long long ago !
Anyway better late than never.
उत्तर द्या
या प्रतिक्रियेशी सहमत (0)
या प्रतिक्रियेशी असहमत (0)
उत्कृष्ट प्रतिक्रिया आहे ! (0)
आक्षेपार्ह